मे 1, 2020
बाळ श्रीकृष्णाचा उच्छाद कमी करण्याकरता यशोदा त्याला दगडी उखळीला बांधून ठेवत असे. सरकारने कोविड विषाणूमुळे टाळेबंदी जाहीर केली आणि प्रत्येक पालकाला आपल्या घरात ह्या उखळीची निकड भासू लागली. ह्या बाटलीतल्या राक्षसांचं काय करायचं असा यक्षप्रश्न घरोघरी पडला. मात्र घरोघरी ह्या प्रश्नांचं उत्तरही लवकरच मिळालं...
कोविड विषाणूशी लढायला सरकारने लॉकडाऊनची वेसण कसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥
शाळा, खेळ, सिनेमे, हॉटेलं बाहेरचं काहीच नाही हे जेव्हा कळलं
तेव्हा आ वासून पालकांच्या तोंडाकडे बघू लागली ही त्यांचीच पिल्लं
रोज ह्यांची करमणूक कशी करायची बुद्धीचा लागू लागला कस
प्रत्येक घरात कोंडले होते हे छोटे छोटे बाटलीतले राक्षस
त्यांच्याशी केलेली वाटाघाटींची बोलणी पार फसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥
कुणी महत्त्वाच्या कागदांची विमानं तर कुणी कपांचा केला चेंडू
कुठे कुठे लक्ष पुरवायचं पालकांचा शिणू लागला मेंदू
त्याने मला मारलं, ती मला बोचकारते सुरु झाल्या आरोळ्या
क्वालिटी फॅमिली टाईमचं श्रीखंड गायब, राहिल्या नुसत्याच चारोळ्या
कॅलेंडरची पानं तारखा सरकवायचं सोडून जणू रुसली
आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/r1xJ7p22ZkE ह्या ठिकाणी ऐकता येईल.









