मार्च 20, 2015
'अन्नदाता सुखी भवं' असं सुभाषित आहे. मात्र आपल्या देशातील अन्नदात्या शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्या सारख्या अ-शेतकरी समाजाला खरंच आहे का? आपल्या बायका-मुलांना वाऱ्यावर सोडून आर्थिक कारणाकरता जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, तेव्हा त्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने सहन केलेल्या दडपणाची आपण कल्पना करू शकतो. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात ह्या 'शेतकरी राजा'ची परिस्थिती कधी सुधारेल का?
मोठे मोठे हुद्दे आणि मोठं मोठं वेतन
जगण्यासाठी प्रत्येकाला लागे मात्र जेवण
प्रत्येक जण म्हणतो आहे मोठं माझंच काम
दिसत नाही कोणालाही शेतकऱ्याचा घाम
जिंकत गेले सारे शेतकरी भोगतो सजा
बाकी सारे तृप्त उपाशी शेतकरी राजा









