एप्रिल 1, 2011
भारताने क्रिकेट विश्वचषकात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आज १९८३च्या विश्वचषकाची आठवण येणं साहजिक आहे. त्या ऐतिहासिक गोष्टीला आता तब्बल २८ वर्ष होऊन गेली आहेत. मनात सहज एक विचार आला, काय करत होतो आपण २८ वर्षांपूर्वी? त्या विचारांनीच रूप घेतलं ह्या 'वर्ष २०००' कवितेचं. पाहा पटतेय का. दोन हजार साली आपण गाठली असेल तिशी गालांवरती दाढी असेल ओठांवरती मिशी अभ्यास नाही शाळा नाही आभाळ सारं खुलं पण लग्न झालं असेल आपलं आणि असतील मुलं नुसत्या कल्पनांनीसुद्धा लाजून जायचो पार दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार









