फेब्रुवारी 19, 2016

विहीर

एखाद्या व्यक्तीला मदत करताना काही वेळा त्या मदतीचा असा काही कैफ चढतो की ती मदत त्या व्यक्तीच्या उपयोगाची आहे का नाही हे तपासून पाहण्याचं भान आपल्याला राहत नाही. तहानलेल्या व्यक्तीला अन्न देण्यासारखा हा प्रकार असतो. अशा वेळी कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की मदत करण्यामागील भावना जितकी महत्वाची असते तितकीच त्या मदतीची उपयुक्तताही महत्वाची असते. सत्येन्द्रला ही विदारक जाणीव गौरीताईंनी करून दिली.". . .

काम नाजूक होतं. दिवस सरकत होते. नागराजच्या जीवाचा धोका प्रत्येक सरकत्या दिवसाबरोबर वाढत होता. कालपासून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. नागराजने काल संध्याकाळपासून हालचाल करणं बंद केलं होतं. आता चिंता मिनिटागणिक वाढत होती . . . आणि अशा मनस्थितीत सत्येंद्र असताना पांडूने नेहेमीप्रमाणे त्याला प्रश्न विचारला ज्यामुळे सत्येंद्रचा पारा चढला होता. . . . "

फेब्रुवारी 5, 2016

नरक

सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं...

 देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी
पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले

पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
          हा तर आहे नरक
जानेवारी 15, 2016

अफूची गोळी

घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते.

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी

नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण
येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन
कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम
सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण

हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी
काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
जानेवारी 1, 2016

वरचढ

खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ...

प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
     स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी

चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
     तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद

अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
     शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान
डिसेंबर 18, 2015

माकड आणि माणूस

माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात

खोलीमध्ये शिडी एक
    उभी होती केली
हुशार एका माकडाची
    नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
    केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
    शिडीवर तू चढ

माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
डिसेंबर 4, 2015

पोटचा गोळा

"परत मुलगीच झाली . . . अरेरे!" हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का?

होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती
कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक
दुसऱ्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक

तिसऱ्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी
आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 20, 2015

आठवणी

भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो ...

मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ

उशिरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
     आठवणी राहून जातात
नोव्हेंबर 6, 2015

राग

आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ...
 
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ

माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
     आपल्यात इतकी मैत्री तरी होती का?

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 16, 2015

घर

काही लोकांच्या घरची टापटीप बघितली की मला कमीपणा वाटत असे. सगळं कसं आखीव रेखीव . . . प्रत्येक वस्तू जागच्या जागी . . . स्वच्छता तर इतकी की जमीन पाहून भांग पाडावा . . .  पण अशा घरांमध्ये मला अवघडून गेल्यासारखं का वाटतं? आपल्या हातून कोचावर चहा सांडेल, काचेची फुलदाणी फुटेल, चमचा हातातून पडेल अशी भीती सारखी का वाटत राहते? मग मी माझं घर नीट निरखून पाहिलं . . . आणि हळूहळू मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली... 

कोपऱ्यात एक जळमट
खुर्चीवर डाग कळकट
भिंत थोडीशी तेलकट
पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मायेचा थर आहे
     ही शोरूम नाही घर आहे

थोडे कपडे अस्ताव्यस्त
पलंगावर चादरी स्वस्त
पुस्तकं इतस्ततः मस्त
पण इथे हवी ती वस्तू हव्या त्या जागेवर आहे
     हे हॉटेल नाही घर आहे