ऑक्टोबर 2, 2015

चांगलं तेवढं घ्यावं

थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यात काही वावगं नाही. मात्र ते करताना त्यांच्या केवळ त्रुटी दाखवून देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं ह्यात काही अर्थ नाही. थोर व्यक्तींना थोरपण ज्या गुणांमुळे लाभतं तेवढे गुण घावेत, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि बाकी सारं सोडून द्यावं...

हाताला बोचले की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भुत मिश्रण पाहावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं

दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं
सप्टेंबर 18, 2015

आठव

'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...

कधी कानावर ये तान
     विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
     मज येई तुझा आठव

कुणी सारी केस बोटाने
     अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
     मज येई तुझा आठव
सप्टेंबर 4, 2015

मृतात्मा

प्रत्येक खुनाला कधी ना कधी वाचा फुटते असं म्हणतात. खरंच?!

. . . एका आयुष्याच्या समाप्तीची निश्चिती त्या मडकं फुटण्याच्या आवाजात ध्वनित झाली. मडक्यातील उरलेलं पाणी आणि मडक्याचे तुकडे इतस्ततः पसरले.
"थोडा संयम पाळला असता तर आज ही वेळ आली नसती." अरे बाप रे! शेजारच्या गृहस्थांचं स्वगत पुन्हा सुरु झालं होतं. मी मघाशीच जागा बदलायला हवी होती. पण आता थोडाच वेळ उरला होता. मी शांतपणे हाताची घडी घालून नजर त्या धगधगणाऱ्या चितेवर ठेवली.
"आपल्या सावजाला बेसावध कसं ठेवायचं ते ह्या मुलीकडून शिकावं. आत्महत्या म्हणे! हा धडधडीत खून आहे खून. मी सांगतो कसा ते." बोलणं पुटपुटल्याप्रमाणे असलं तरी मला स्पष्ट ऐकू येत होतं . . .
ऑगस्ट 21, 2015

बायकोचा मित्र

'घर की मुर्गी दाल बराबर' ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या 'बायको' ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे 'बाहर की दाल मुर्गी बराबर' वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.

दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा
आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा

थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू
मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर 'हॅलो, हाऊ आर यू'

'गिव मी टू मिनिट्स' असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला
वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला

रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा
आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा
ऑगस्ट 7, 2015

युधिष्ठीर आणि दुर्योधन

'सर्वसाधारण नागरिक भ्रष्टाचारामुळे भरडला जात आहे' ह्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण अनेकदा सर्वसाधारण नागरिकाला भरडणाराही एक सर्वसाधारण नागरिकच असतो असा अनुभव येतो. भ्रष्टाचार म्हटलं की आपण लगेच राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडतो पण नीट डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार सुरु असल्याचं जाणवतं. मग भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हावं असं नक्की कोणाला वाटतंय? . . .

रिक्षाचालक दुर्योधनाने मीटरमध्ये केला होता फेरफार
युधिष्ठीर कारकून जेव्हा रिक्षाने स्टेशनवरून घरी गेला

कारकून दुर्योधनाने कार्ड देण्यापूर्वी चहापाण्याकरता पैसे मागितले
युधिष्ठीर पोलीस जेव्हा रेशन कार्ड बनवायला गेला

पोलीस दुर्योधनाने गाडी अडवून लाच मागितली
युधिष्ठीर डॉक्टरची गाडी जेव्हा चुकून सिग्नल तोडून पुढे गेली

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/pCaVDvsMjP4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 17, 2015

मत्सर

अमेरिकेतील एका संशोधनानुसार सामाजिक माध्यमांवर (social media) अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारच्या न्यूनगंडाची बाधा होते. सामाजिक माध्यमांवरील ओळखीच्या इतर सर्व व्यक्ती पराकोटीच्या सुखात नांदत आहेत असं चित्र त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ती व्यक्ती स्वतःसुद्धा इतरांना तसंच भासवायचा प्रयत्न करत असली तरी कुठेतरी मनात स्वतःबद्दल कमीपणा बळावू लागतो. तुमच्या बाबतीत असं घडतं का?

त्या कुणाला आप्त-मित्रांच्या मृत्यूचा शोक नसतो
कारण कुणी मुळात आजारीच पडत नाही
सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जुलाब नाही
कावीळ नाही नागीण नाही कॅन्सर नाही एड्स नाही

प्रत्येक जण सुसंस्कृत कुणी अपशब्द वापरत नाहीत
बायकोला मारणं सोडा साधं तिच्याशी भांडतही नाहीत
आईवडिलांची सेवा करतात मुलांचे पापे घेतात
सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/4YG0m3GMx24 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 3, 2015

दरवडेखोर

खरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला ... 

ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा

ऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर
     आश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर
बंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा 
     कुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर

स्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा
जून 19, 2015

वीकएंड

फार फार पूर्वीचे मध्यमवर्गीय म्हणे सिनेमे बघणं, आप्त-मित्रांच्या भेटीला जाणं, खरेदी करणं, मुलांचा अभ्यास घेणं, रेडिओ ऐकणं वगैरे गोष्टी आठवड्यातील कोणत्याही दिवशी करायचे. मग हे ३० / ४० / ५० वर्षांपूर्वीचे मध्यमवर्गीय आदिमानव वीकएंडला करायचे तरी काय?

नवीन काही घडत नाही तसाच दिवस सरे
     अनुभव एवढा मोठा माझा शत्रू तोच ठरे
रोज रोज कंटाळवाणं काम तेच तेच
     लोक तेच तेच आणि तेच तेच पेच

आठ वाजले तरी काम सोडत नाही पाठ
     दिवस ढकलतोय बघत वीकएंडची वाट
मे 15, 2015

कायदा पाळणारा गाढव

तुम्ही वेळेवर कर भरता का? तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता का? तुम्ही दुकानांत वस्तूंच्या पावत्या मागता का? तसं असेल तर तुम्ही गाढव आहात . . . दचकू नका. आपल्या देशात, जिथे जास्तीत जास्त कायदा मोडणाऱ्याला हुशार किंवा चतुर समजलं जातं, तिथे दुसरं काय म्हणणार?

आयुष्यभर झुरतोय घ्यायला घर मोठं
त्याने मात्र खोली बांधली जिथे अंगण होतं
तरीही घरपट्टीला उशीर झाला तर मीच घाबरतो
कारण,  कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो

लहानपणापासून ऐकत आलो आहे बात
कायद्याचा म्हणे भारी लांब असतो हात
पण हा हात कायदा मोडणाऱ्यांना कधी धरतो?
कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो