जुलै 22, 2023

मुहूर्त

शुभकार्याकरता पंचांग पाहून मुहूर्त शोधणं जमलं नाही तर निदान साडेतीन मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त साधणं ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. हल्लीच्या काळातही व्यायाम, ऑफिसमधून घरी लवकर येणं, जिभेवर ताबा ठेवणं ह्याकरता नवीन वर्षाच्या मुहूर्ताची वाट पाहणारे काही अपवादात्मक नाहीत. ह्या कवितेकरताही मी एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होतो. पण मग म्हटलं ..

मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही
तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥

ऑफिसमध्ये उशीर व्हायला कारण काही नसतं
पत्नी मुलांना घेऊन जरा फिरायला जा मस्त
कुटुंबीयांच्यासोबत एकदा काढण्या वेळ असाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
मार्च 26, 2023

मोकळा वेळ

उतारावरून वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे माणसं बेबंद आयुष्यं जगत होती. मध्येच महामारीचा धोंडा पडला आणि पाणी काही काळाकरता शांत झालं. काही काळाने विज्ञानाच्या मदतीने हा धोंडा दूर झाला आणि मोकळा वेळ म्हणजे काय हे भान आलेली माणसं पुन्हा एकदा बेभानपणे धावू लागली. हाती असलेला वेळ अमर्याद असल्याप्रमाणे ..

तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का?

अंहं … रात्री झोपण्यापूर्वी मोजून मापून फोन आणि टीवी बघायला मिळणारा नव्हे
शनिवार रविवारी घरच्या कामाकरता मिळणारा नव्हे
वर्षातून एकदा सुट्टी घेऊन
पहाटे पाच वाजता उठायला लावणाऱ्या कण्डक्टेड टूर्समध्ये मिळणारा … तोही नव्हे

मोकळा म्हणजे खरोखर मोकळा
लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा … तसा
शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत
वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा … तसा
कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा … तसा

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/x6GTEyX2AxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं

निवडणुका जवळ आल्या की समाजातील धृवीकरण वाढू लागतं. इतकं की समाजातील निरनिराळे घटक महामानवांनाही आपसात वाटून घेतात. मग आपल्या महामानवाचं उदात्तीकरण आणि समोरच्या महामानवाचं चारित्र्यहनन ह्याकरता शब्दांचे खेळ सुरु होतात. ते इतक्या टोकाला जातात की काही दिवसांनी ते शब्द उच्चारणाऱ्यांचा त्यावर ठाम विश्वास बसतो आणि समाजातील हे विष वाढतच जातं .. 

हाताला बोचलं की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भूत मिश्रण पाहावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

आई वडिलांचं वागणं कधी मनाला पटत नाही
त्याचं बोलणं कधी मनाला रूचत नाही
आपण त्यांचं आपल्यावर असलेलं निर्व्याज प्रेम आठवावं
प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं ॥

माझी ‘चागलं तेवढं घ्यावं’ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dkSkCB_p5Jg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..

तुमच्याही बाबतीत असं होत असेल ना? म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..

आल्याचा मंद सुगंध
सुंदर दिसत होता रंग
म्हटलं थोडं आणखीन दुध घालू या
... आणि चहा दुधाळ झाला ॥

मैत्रीचं नातं असं घट्ट
संकटातही उभा राहायचा दत्त
म्हटलं थोडा आणखीन वाद घालू या
... आणि मित्र रुसून गेला ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..

देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल ..

देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा
अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा
भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही
आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 14, 2021

प्रतिज्ञा

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे ...’ आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हटलेली आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा असल्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून एकत्र येण्याचा संदेश ही प्रतिज्ञा देते. आज पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक भारतीयाने ही प्रतिज्ञा पुन्हा एकदा करण्याची वेळ आली आहे. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यामागील अर्थ समजून घेऊन ...

इतिहासाने घालून दिलेली पृथ्वीवरील वेस आहे
श्वासाइतकं सत्य आहे भारत माझा देश आहे ॥

लहानपणी आपण प्रत्येकाने ही प्रतिज्ञा म्हटली होती
आता मात्र शब्दांबरोबर त्यातील भावनाही नामशेष आहे ॥

माझे धर्म भाषा प्रांत त्याचे धर्म भाषा प्रांत
माझ्या देशातील बांधवांमध्येही आता सख्खे सावत्र अशी रेष आहे ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/VAVE5ntF3FM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 17, 2021

लाट

आपल्या मनात एक शांत डोह असतो. रोजच्या धावपळीत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. मात्र कधीतरी... एखाद्या कातर संध्याकाळी... जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा आपण त्या डोहाच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहतो. कसे कुणास ठाऊक अचानक त्या डोहात तरंग उठू लागतात. किनाऱ्यावर उभं असलेल्या आपल्यापर्यंत त्या लाटा पोहोचतात. आठवणींच्या लाटा! सुरुवातीला अगदी हळूवार... आणि मग...

शांत एका संध्याकाळी आठवणींची लाट उठली
आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटली ||

वाऱ्याची एक झुळूक आली अंगावर आला काटा
डोळ्यांसमोर दिसू लागल्या मागे पडलेल्या वाटा ||

नक्की समजत नव्हतं पण वाटू लागलं उदास
जणू कसलीशी पूर्वसूचना मिळत होती मनास ||

बघता बघता काळे ढग मन भरून आलं दाट
मग आठवणींची धडकू लागली लाटेमागून लाट ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ekAFpxpSmHE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 18, 2020

अनादी अनंत लढा

युगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो ...

तुडवून झाल्या किती वाटा
उसंत नाही श्रमी आता
सलत राहिला तरी काटा
     किती मोठा आकडा
अनादी अनंत लढा ॥

‘दीक्षित’ झालो समरसूनी
‘दिवे करां’नी उजळवूनी
तम न जाई काही करुनी
     जाई निश्चयी तडा
अनादी अनंत लढा ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 8, 2020

विसात नव्वद शोधू नको

‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते ...

कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको
     विसात नव्वद शोधू नको ॥

जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे
तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे
काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको
     विसात नव्वद शोधू नको ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.