माझी मायबोली
- माझं लेखन
आ पल्या हातून घडलेलं नवनिर्माण – मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो – रसिकांपर्यंत पोहोचावं असं प्रत्येकाला वाटतं. मी त्याला अपवाद नाही..
लेखन आणि इंटरनेट ह्या दोन माध्यमांचा संगम मराठी भाषेच्या प्रसार आणि विकासाकरता वरदान ठरेल ह्यावर माझा विश्वास आहे. त्या दृष्टीने माझं लेखन ह्या संकेतस्थळावर सादर करून मी एक लहानसं पाऊल उचलत आहे.
आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण ... कवीराज ते आले आले झाली पळापळ आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥ काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही कवीराज ते आले आले झाली पळापळ खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥ उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे कवीराज ते आले आले झाली पळापळ केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज प्रेमाचा उत्सवदिन आहे. त्या दिवशी गाडी चालवताना पाहिलं समोरच्या वाहनाच्या मागे लिहिलं होतं, ‘भेटली होती, पण नशिबात नव्हती’. इतक्या मोजक्या शब्दांत त्या वाहनाच्या मालकाने आपल्या मनातला एक ठसठसता कोपरा उघड केला होता. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की अशा अडथळ्यांमुळे थांबलो तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तुमच्या बाबतीत आले होते का कधी असे अडथळे? विसरू कसा मी माझ्या ताब्यात रात्र नव्हती ती भेटली परंतु नशिबात मात्र नव्हती ॥ खिडकीत त्या समोरील माझ्या मनीचे भाव दावेल ऐसी खिडकी माझ्या घरात नव्हती ॥ उतरली आलिशान गाडीतूनी तिच्यावर खर्चेन इतुकी रक्कम माझ्या खिशात नव्हती ॥ स्थळ पाहण्यास गेलो मैत्रीण पण मुलीची गोडी तिच्यात होती ती त्या स्थळात नव्हती ॥ ही गजल यूट्यूबवर https://youtu.be/sLZcV2uqwKQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
लहान असण्याचे दोन फायदे असतात. एक म्हणजे लहानपणी भावना व्यक्त करायला कोणतीही आडकाठी नसते – आनंद झाला हसा, दुःख झालं रडा. दुसरं म्हणजे दिवसाच्या शेवटी आपल्या साऱ्या भावना बाजूला ठेवून अगदी सुरक्षित वाटेल अशी त्यांची एक हक्काची जागा असते. आईची कूस! दुर्दैवाने मोठ्यांचं तसं नसतं .. गाडी थांबवून एके ठिकाणी मी खुणेनेच बोलावलं खाली करून काच फुटपाथवर एक कुटुंब राहत होतं ज्यात मुलं होती पाच ॥ गाडीतून काढलेल्या पिशव्यांभोवती जमली ती मुलं आणि त्यांची माउली पिशव्यांमध्ये स्वच्छ कपडे, काही खाण्याचे पदार्थ आणि होती ती एक बाहुली ॥ पिशव्या घेऊन पटापट ती मुलं झाली पसार वेळच नाही मिळाला करायला तिच्या मनाचा विचार ॥ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/Ofdfzk4rh7w ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज जागतिक धर्मदिन आहे. पृथ्वीवरील एका जीवाला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तो निसर्गातील घडामोडींचा अर्थ लावू लागला. सुसूत्रतेने चालणाऱ्या निसर्गचक्रामागे एखादी अतिमानवीय शक्ती असणार ह्याची त्याला खातरी पटली. त्यातून देव आणि मग धर्म ह्या संकल्पनांचा जन्म झाला. मानवाच्या त्याच वैचारिक क्षमतेमुळे पुढे विज्ञानाची वावटळ आली ज्यात असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची काही निराळीच उत्तरं मानवाला मिळू लागली. देव आणि धर्म मात्र तिथेच राहिले ... आजही आहे संस्कृती अन् आजही चाले पूजा आजही म्हणती आमचाच देव नाही कोणी दुजा सारे म्हणती एकच देव रूपं त्याची अनेक देवाचंच नाव घेऊन चाले पण अतिरेक मनीच्या वाईट प्रवृत्तींना घालण्याला लगाम देव बनवतो आपण त्याचे बनतो पण गुलाम ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/z0fuibfFQ48 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
युगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो ... तुडवून झाल्या किती वाटा उसंत नाही श्रमी आता सलत राहिला तरी काटा किती मोठा आकडा अनादी अनंत लढा ॥ ‘दीक्षित’ झालो समरसूनी ‘दिवे करां’नी उजळवूनी तम न जाई काही करुनी जाई निश्चयी तडा अनादी अनंत लढा ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते ... कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको विसात नव्वद शोधू नको ॥ जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको विसात नव्वद शोधू नको ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.

मनोगत
सन २०११ सालच्या जानेवारी महिन्यात माझं नवनिर्मिती.इन हे संकेतस्थळ सुरु झालं. ह्या संकेतस्थळाच्या नावामागील कार्यकारण पुढे सविस्तर लिहिलं आहे. मात्र मी जे काही लिहितो ते तुम्हा वाचकांपर्यंत तुमच्या सोयीनुसार पोहोचावं हादेखील ह्या संकेतस्थळामागील एक हेतू होता आणि अजूनही आहे. गेल्या सात वर्षांच्या साहित्य प्रवासात एक व्यक्ती म्हणून मी जसा घडत गेलो त्यानुसार संकेतस्थळातही सुधारणा करण्याची आवश्यकता भासू लागली. सन २०१८च्या जानेवारी महिन्यात हे नवीन रूपातील तेच संकेतस्थळ तुमच्यापुढे सादर करत आहे. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.