माझी मायबोली
- माझं लेखन
आ पल्या हातून घडलेलं नवनिर्माण – मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो – रसिकांपर्यंत पोहोचावं असं प्रत्येकाला वाटतं. मी त्याला अपवाद नाही..
लेखन आणि इंटरनेट ह्या दोन माध्यमांचा संगम मराठी भाषेच्या प्रसार आणि विकासाकरता वरदान ठरेल ह्यावर माझा विश्वास आहे. त्या दृष्टीने माझं लेखन ह्या संकेतस्थळावर सादर करून मी एक लहानसं पाऊल उचलत आहे.
आज जागतिक धर्मदिन आहे. पृथ्वीवरील एका जीवाला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तो निसर्गातील घडामोडींचा अर्थ लावू लागला. सुसूत्रतेने चालणाऱ्या निसर्गचक्रामागे एखादी अतिमानवीय शक्ती असणार ह्याची त्याला खातरी पटली. त्यातून देव आणि मग धर्म ह्या संकल्पनांचा जन्म झाला. मानवाच्या त्याच वैचारिक क्षमतेमुळे पुढे विज्ञानाची वावटळ आली ज्यात असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची काही निराळीच उत्तरं मानवाला मिळू लागली. देव आणि धर्म मात्र तिथेच राहिले ... आजही आहे संस्कृती अन् आजही चाले पूजा आजही म्हणती आमचाच देव नाही कोणी दुजा सारे म्हणती एकच देव रूपं त्याची अनेक देवाचंच नाव घेऊन चाले पण अतिरेक मनीच्या वाईट प्रवृत्तींना घालण्याला लगाम देव बनवतो आपण त्याचे बनतो पण गुलाम
युगानुयुगं चाललेल्या ह्या लढ्याला सणासुदीच्या दिवसांत विशेषतः दिवाळीमध्ये एखाद्या महायुद्धाचं रूप प्राप्त होतं. समोर चिवडा शेवेचं अकरा अक्षौहिणी सैन्य उभं ठाकलेलं असतं ज्याचं नेतृत्व लाडू, चकली, करंजी, अनरसा अशा आपल्या प्रियजनांच्या हाती असतं. मनातील श्रीहरी आपल्याला ‘युद्ध्य च’ करण्यास प्रवृत्त करत असतो, आणि आपण मात्र गाण्डीवाचा त्याग करून हतवीर्य होऊन त्या शत्रूला शरण जातो ... तुडवून झाल्या किती वाटा उसंत नाही श्रमी आता सलत राहिला तरी काटा किती मोठा आकडा अनादी अनंत लढा ॥ ‘दीक्षित’ झालो समरसूनी ‘दिवे करां’नी उजळवूनी तम न जाई काही करुनी जाई निश्चयी तडा अनादी अनंत लढा ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/NnkekN9OgGo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
‘हल्लीच्या मुलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही’ किंवा ‘आमच्या वेळेला हे असलं वागणं मुळीच खपवून घेतलं जात नसे’ ही विधानं अनादी काळापासून आजतागायत केली जात आहेत. जुनी पिढी नव्या पिढीला लहानाचं मोठं होताना बघते जे त्यांना स्वीकारता येत नाही आणि नव्या पिढीला जुनी पिढी अडगळ वाटू लागते. कालचक्राची अपरिहार्यता लक्षात आली की जुनी पिढी नव्या काळात आपला जुना काळ शोधू लागते ... कालचक्र हे फिरतच राही दुःख वृथा तू करू नको विसात नव्वद शोधू नको ॥ जुनी जाहली तुझी पिढी अन् नवी पिढी हे सरसावे तुझ्या पिढीच्या स्वप्नांमागे नवी पिढी ती बघ धावे काळाची ही नदी वाहती उगाच तिजला अडवू नको विसात नव्वद शोधू नको ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVDHSn-KCr4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
करोनामुळे लागलेली टाळेबंदी संपून केशकर्तनालयं पुन्हा सुरु होईपर्यंत सुरक्षित अंतर राखण्याचा नियम असा काही अंगवळणी पडला होता की एखादी परकी व्यक्ती आपल्या शरीराच्या इतक्या जवळ घिरट्या घालते आहे हा विचारही अशक्य वाटू लागला. तरी काही जणांनी धोका पत्करण्याचा निर्णय घेतला, काही जणांनी घरातल्यांकडून केस कापून घेण्याचा निर्णय घेतला. पण निर्णय न घेणं हाही एक निर्णय असू शकतो. मी तेच केलं ... आधी कपाळ मग नाक मग हनुवटीची ओलांडली वेस आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ लहानपणी डोक्यावर हजामतीची नियमित घडत असे सेवा पण मित्रांचे वाढवलेले केस बघून मला वाटत असे हेवा मार खात असत शिक्षकांचा पण लावत नसत केसाला कातरी तेच होते माझे बालपणीचे शूरवीर हीरो माझी पक्की होती खातरी आम्ही ‘शहाणी मुलं’ वरवर म्हणायचो अशा मुलांना गॉन केस आयुष्यात पहिल्यांदाच इतके वाढवले आहेत केस ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/vl5jkNJqBUU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज राष्ट्रसंघ दिवस आहे. ग्लोबल विलेज किंवा वैश्विक गावाची संकल्पना स्वीकारली तर राष्ट्रसंघ म्हणजे त्या गावची ग्रामपंचायत ठरतं. आता ग्रामपंचायत म्हटली की गावातील लोकांचे हेवेदावे, भांडणं, रुसवे-फुगवे ह्या साऱ्याचं प्रतिबिंब त्यात पडणारच. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या राष्ट्रांना सुचलेलं शहाणपण असलेली राष्ट्रसंघ नावाची ही जगपंचायतही शीतयुद्ध, अखाती युद्ध, कोरियन युद्ध, अमेरिका-चीन वाद असे अनेक तंटे सहन करत कशीबशी काम करत राहिली आहे. येका आगळ्यायेगळ्या गावचा न्यारा होता ढंग ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ आटपाट ब्रह्मांडात येक न्यारं व्हतं गाव निळ्या निळ्या त्या गावाचं प्रिथवी व्हतं नाव गाव मोठं सुरेख त्याचं पानी लई लई ग्वाड पन गावातील त्या मानसं व्हती येकाहून येक द्वाड येगळ्या येगळ्या दिशेस होती त्या समद्यांची तोंडं लाथाळ्या अन् तंटे करती जशे गावगुंड येकदा मोठा राडा झाला असा वाटे धाक निम्म्याहून जास्त घरं झाली बेचिराख गावकरी मग जमले सारे बांधला त्यांनी चंग ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hqqxYRbcLXY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. ‘शीः रडतोयस काय मुलींसारखा’ ह्या लहानपणी ऐकलेल्या वाक्यापासून पुरुषांचा एक कोरडा प्रवास सुरु होतो. आपल्याकरता बावळट, भेकड अशी शेलकी विशेषणं वापरली जातील ह्या सामाजिक भीतीपोटी पुरुष रडणं आधी दडपतात आणि मग विसरूनच जातात. पुरुषांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण जास्त असण्यामागे ही भीती तर नसेल ... लहान होता मुलगा माझा झाली होती कावीळ बायकोचंही काळीज तुटत होतं तीळतीळ रडून चालत नाही कितीही बाका आला वख्त आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥ माझ्या नकळत मोठी झाली होती काल लहान मनातले कढ मनात रिचवून केलं कन्यादान अश्रूंचा आधार आईला मी तर बापच फक्त आयुष्यात एकदा तरी रडायचंय मनसोक्त ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hzXP-T5AFp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चारोळया

मनोगत
सन २०११ सालच्या जानेवारी महिन्यात माझं नवनिर्मिती.इन हे संकेतस्थळ सुरु झालं. ह्या संकेतस्थळाच्या नावामागील कार्यकारण पुढे सविस्तर लिहिलं आहे. मात्र मी जे काही लिहितो ते तुम्हा वाचकांपर्यंत तुमच्या सोयीनुसार पोहोचावं हादेखील ह्या संकेतस्थळामागील एक हेतू होता आणि अजूनही आहे. गेल्या सात वर्षांच्या साहित्य प्रवासात एक व्यक्ती म्हणून मी जसा घडत गेलो त्यानुसार संकेतस्थळातही सुधारणा करण्याची आवश्यकता भासू लागली. सन २०१८च्या जानेवारी महिन्यात हे नवीन रूपातील तेच संकेतस्थळ तुमच्यापुढे सादर करत आहे. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.