जून 17, 2011

तिची आणि माझी भेट

काही दिवसांपूर्वी मला लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्याची एकदा नाही तर दोनदा संधी मिळाली. लग्नाला पन्नास वर्षं होणं म्हणजे समजुतदारपणा आणि आरोग्य ह्यांचा दुर्मिळ संगम. पन्नास वर्षांपूर्वी जग कसं होतं ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षं म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे ते लक्षात येईल. सादर आहे ह्याच विचारांवर बनलेली एक कविता 'तिची आणि माझी भेट'.

नरी कॉन्ट्रॅक्टर होता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
पुलंची अपूर्वाई आणि गणगोत ही पुस्तकं लोकप्रिय झाली होती फार
मुघल-ए-आझमच्या भव्यतेने लोक वेडे झाले होते पार
लताचं अल्ला तेरो नाम रेडिओवर वाजत आणि गाजत होतं सातही वार
जेव्हा दिलीप वेंगसरकरचं वय होतं फक्त चार
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
     पन्नास वर्षांपूर्वी
जून 3, 2011

अघोरी

जून ४ हा दिवस राष्ट्रसंघाने क्रौर्यामुळे बळी जाणाऱ्या बालकांचा दिवस म्हणून जाहीर केला आहे. ह्या क्रौर्याचा संबंध जरी युद्धकाळाशी असला तरी आपल्या समाजातही ह्या दिवसाचा संदर्भ महत्वाचा आहे. लहान मुलांवर हात उगारणं म्हणजे स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या व्यक्तीवर केलेला भ्याड अत्याचार. मुलांना सुधारण्याकरता त्यांना मारण्याआधी पालकांनी स्वतःला आरशात पाहावं. आपण ऑफिसला न जाण्याकरता खोटं कारण द्यायचं आणि मुलांनी खोटं बोललं की त्यांना मारायचं ह्यातील दांभिकता मुलांना लगेच समजते. माझी 'अघोरी' ही काव्यकथा लिहिताना मला बराच त्रास झाला. ती वाचताना कदाचित तुम्हालाही त्रास झाला तर ती सर्वस्वी माझी चूक असेल. पण कधी कधी एखादा मुद्दा जोरकसपणे मांडण्याकरता काहीतरी धक्कादायक लिहिणं भाग असतं ...

विचार करण्यापलीकडे मी
गेलो होतो पार
मिळेल त्याने हातावरती
केले चार प्रहार ...

आजही चिंटू माझ्यावरती
तितकंच प्रेम करतो
पण हाताकडे पाहत आपल्या
नेहमी प्रश्न पुसतो ...
मे 20, 2011

अजब जंगल

मे महिन्याची सुट्टी सुरु आहे आणि घरातल्या बाळगोपाळांना पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटत असेल. मुलांची मात्र धमाल सुरु आहे. खास तुमच्या घरातील बच्चे कंपनीकरता एक बालगीत सादर करत आहे, 'अजब जंगल'. त्यांना जरूर वाचून दाखवा ... पाहा आवडतंय का ते!

काळ्या फुलावरती एका बसला होता हत्ती
फुंकर मारता उडून गेला करू लागला मस्ती
मगरी उडत होत्या गगनी चालत नव्हती अक्कल
वाघ खाती गवत मोठं अजब होतं जंगल

भरधाव पळे कासव मागे लागली गोगलगाय
बिळात पळाला जिराफ माझा पडणार होता पाय
झाडावरच्या घरट्यात अंडी उबवत होतं अस्वल
चार पायांचा साप मोठं अजब होतं जंगल

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1YgZacK0PAM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 6, 2011

आळस

१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो ... म्हणजेच काम करणाऱ्यांचा दिवस. त्यामुळे ह्या दिवशी माझ्यासारख्या आळशी माणसांना कुठे लपावं ते समजत नाही. माझे कामसूपणाबद्दलचे काही 'प्रांजळ' विचार 'आळस' ह्या कवितेद्वारे मांडत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पटतील ह्यात मला शंका नाही. १ मे बद्दल लिहिलेली कविता इतक्या उशिरा का? कारण अर्थातच ... 'आळस'!

पुसती मला ते कामापासून
     दूर का तू पळशी
जग सारं काम करतं
     असा कसा तू आळशी

माझं म्हणणं काम मला जर
     समोर दिसलंच नाही
तर त्याच्यापासून दूर पळायचा
     प्रश्नच येत नाही

कामं करण्यासाठी लागते लोकांची का चुरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस
एप्रिल 15, 2011

निसर्ग

२२ एप्रिल हा दिवस 'जागतिक पृथ्वीदिन' (International Earth Day) म्हणून साजरा होतो. सध्याच्या विज्ञानाच्या मर्यादांमुळे निदान नजीकच्या भविष्याततरी आपल्यासमोर पृथ्वी ग्रह सोडून दुसरा कोणताही विकल्प उपलब्ध नाही. आपल्यासारख्या शहरातल्या किड्यांना आपल्या सभोवतालचं काँक्रिटचं जंगल म्हणजेच पृथ्वी वाटली तर त्यात नवल नाही. पृथ्वीवरील निसर्गाचं सौंदर्य आणि ऐश्वर्य केवळ काव्यामध्येच राहणार नाही ना? असंच एक निसर्गावरील काव्य, पहा आवडतंय का ते ...

मेघ नभी थरथरले
सर सर पाणी झरले
नदी नालेही भरले   
     सचैल भिजली धरा
कोंब नवे अंकुरले
हिरव्या रंगी मुरले 
नवीन जीवन स्फुरले
     चमत्कार तो खरा

छाया वटवृक्षाची
अन् पाती गवताची
फळे भिन्न स्वादाची
     काय अहो आश्चर्य
विहरत गगनी पक्षी
हरीणकांतीची नक्षी
श्वास अडकला वक्षी
     पाहून ते सौंदर्य
एप्रिल 1, 2011

वर्ष २०००

भारताने क्रिकेट विश्वचषकात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आज १९८३च्या विश्वचषकाची आठवण येणं साहजिक आहे. त्या ऐतिहासिक गोष्टीला आता तब्बल २८ वर्ष होऊन गेली आहेत. मनात सहज एक विचार आला, काय करत होतो आपण २८ वर्षांपूर्वी? त्या विचारांनीच रूप घेतलं ह्या 'वर्ष २०००' कवितेचं. पाहा पटतेय का.

दोन हजार साली आपण गाठली असेल तिशी
गालांवरती दाढी असेल ओठांवरती मिशी
अभ्यास नाही शाळा नाही आभाळ सारं खुलं
पण लग्न झालं असेल आपलं आणि असतील मुलं
नुसत्या कल्पनांनीसुद्धा लाजून जायचो पार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार
मार्च 18, 2011

शिकवण

२१ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय वर्णभेदविरोधी दिन' म्हणून पाळला जाणार आहे. भारताला वर्णभेदाची लागण जरी झाली नसली तरी जातीयवादाची पाळंमुळं फार खोलवर पसरलेली आहेत. २१ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय कविता दिन'सुद्धा असल्यामुळे ह्या विषयावर आधारित माझी 'शिकवण' ही कविता सादर करत आहे.
 
स्वामीजींच्या मनात होता विचार काही नेक
     युवराजाला ठेवून घेण्या कारण होते एक
राजाच्या त्या राज्यामध्ये गेले होते स्वामी
     जनतेमध्ये दिसे तयांना दुःखाचा अतिरेक
 
जातीयतेला उधाण जागोजागी अस्पृष्यता
     मनामनातील भिंतींना ते राज्य देई मान्यता
भेदभाव तो पाहून झाले स्वामीजी विदीर्ण
     शिक्षण दिधले युवराजाला सर्वश्रेष्ठ मानवता
फेब्रुवारी 18, 2011

आई

८ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून पाळला जाणार आहे. आपल्या आयुष्यात येणारी पहिली महिला म्हणजे आपली आई. आईच्या आपल्या अपत्यावर असलेल्या निस्सीम, निर्भेळ, निर्व्याज प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. पण आपण आपल्या आईच्या प्रेमाला तितकाच उत्कट प्रतिसाद देतो का? सादर आहे काव्यकथा 'आई'.
 
आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
 
घर आणि शाळा सोडून जगच मजला नव्हतं
घरात आम्ही दोघंच आणि तिसरं कुणीही नव्हतं
किती होती कुरूप तिजला नव्हता हो अंदाज
एकमेव त्या डोळ्याची पण मलाच वाटे लाज
 
तिला बोलणं घालून पाडून हाच माझा चाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
फेब्रुवारी 12, 2011

क्रिकेट आणि युद्ध

क्रिकेटला जर धर्म मानला तर विश्वचषक स्पर्धेला कुंभमेळा किंवा हजची यात्रा म्हणायला हरकत नसावी. विशेषतः मराठी मनाला तर क्रिकेट म्हणजे अगदी कबड्डी किंवा खोखोइतका जवळचा खेळ. क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबद्दलचे माझे विचार कवितेच्या रूपाने मांडायचा प्रयत्न करत आहे.

लारा, वॉर्न, मुरली पाहून चढतो आम्हा चेव
हिरो आमच्याकरता धोनी, सुनील, कपिल देव
क्रिकेटच्या प्रेमाला आमच्या नसते कुठली हद्द
क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन असतो देव

असा विचार करणाऱ्यांच्यात असतात आबालवृद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध