जून 17, 2016

व्यसन

माकडापासून मानव उत्क्रांत होताना शेपटी हा शरीराचा एक अवयव गेला पण व्यसन हा मनाचा एक अवयव मात्र चिकटला. बढाईखोरांचं "मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही." इथपासून "मी WhatsApp दिवसातून फक्त तीनदाच check करतो." इथपर्यंत स्थित्यंतर आपण बघितलं आहे. सर्व व्यसनांपासून मुक्ती ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे. व्यसनामुळे आपल्याला आनंद मिळत असताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढी काळजी मात्र नक्कीच घेता येईल...

व्यसन नावाच्या सापळ्याचे
     असतात खूप प्रकार
बाहेरख्यालीपणापासून
     सिगरेट दारू जुगार

व्यसन कॉम्प्युटरचं असलं
     तहान नाही भूक
माणसं झाली बेटं
     कारण नाती झाली मूक
जून 3, 2016

कठीण प्रश्न

सध्या प्रसारमाध्यमांचं युग सुरु आहे. टीवी, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे माध्यमांवर अनेक प्रश्नांबाबत तावातावाने चर्चा चाललेली असते. प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं काही ना काही उत्तर असतं. आणि तरीही काही प्रश्न सोपी उत्तरं न दिल्याने कठीण होऊन बसलेले आहेत. मला पडलेले असेच काही 'कठीण' प्रश्न... 

माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त

विडी सिगारेट आरोग्याला अपायकारक फार
कानीकपाळी ओरडून सांगे आपल्याला सरकार
तंबाखूचा उद्यम कैसा चाले मग निर्धास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त
एप्रिल 4, 2016

काळजी घे

माणूस समूहात राहणारा प्राणी असल्यामुळे बरेचदा त्याच्याकरता मुंग्या, पक्षी, मासे अशा समूहात राहणाऱ्या प्राण्यांची उपमा वापरली जाते. मात्र माणूस हा ह्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी भिन्न प्राणी आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव असते. त्यामुळे माणसाकरता आपल्या समूहाच्या संरक्षणाएवढंच स्वतःचं वैयक्तिक संरक्षणही महत्वाचं असतं...

तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे
     तुझ्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे
पृथ्वीवरील जीवसृष्टी पुढे नेणं हे तुझं लक्ष्य नव्हे
     तुझं जगणं केवळ भक्षक किंवा केवळ भक्ष्य नव्हे

तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे
तुझं एकच आयुष्य आहे
          काळजी घे
मार्च 18, 2016

नव्याण्णववासी

तीन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या बऱ्याच जणांना चार खोल्यांच्या घराची आस असते. त्याच वेळी काही जण दोन खोल्यांच्या घरातही सुखाने नांदतात. असण्या / नसण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला हा विसंवाद दिसून येतो. ह्याला कारण म्हणजे आपण बहुतेक सगळेच 'नव्याण्णववासी' आहोत . . . 

राजा होता एक 		स्वामींपाशी आला
होता मोठा नेक 		पण दुःखी होता झाला

माझ्यापाशी छान 	सुखसंपत्ती सारी
तरीही समाधान		नाही मनाच्या दारी

स्वामी थोडे हसले 	हळूच आपुल्या गाली
राजासमोर बसले 	नजर तयाच्या भाळी

चिंता तुझ्या मनाशी 	आहे त्याच्या मागे
तू नव्याण्णववासी 	कारण आहे साधे
मार्च 4, 2016

सोयीस्कर देशभक्ती

आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना?

त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला
     व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला

प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट
     देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत

देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील
     उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
फेब्रुवारी 19, 2016

विहीर

एखाद्या व्यक्तीला मदत करताना काही वेळा त्या मदतीचा असा काही कैफ चढतो की ती मदत त्या व्यक्तीच्या उपयोगाची आहे का नाही हे तपासून पाहण्याचं भान आपल्याला राहत नाही. तहानलेल्या व्यक्तीला अन्न देण्यासारखा हा प्रकार असतो. अशा वेळी कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की मदत करण्यामागील भावना जितकी महत्वाची असते तितकीच त्या मदतीची उपयुक्तताही महत्वाची असते. सत्येन्द्रला ही विदारक जाणीव गौरीताईंनी करून दिली.". . .

काम नाजूक होतं. दिवस सरकत होते. नागराजच्या जीवाचा धोका प्रत्येक सरकत्या दिवसाबरोबर वाढत होता. कालपासून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. नागराजने काल संध्याकाळपासून हालचाल करणं बंद केलं होतं. आता चिंता मिनिटागणिक वाढत होती . . . आणि अशा मनस्थितीत सत्येंद्र असताना पांडूने नेहेमीप्रमाणे त्याला प्रश्न विचारला ज्यामुळे सत्येंद्रचा पारा चढला होता. . . . "

फेब्रुवारी 5, 2016

नरक

सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं...

 देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी
पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले

पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
          हा तर आहे नरक
जानेवारी 15, 2016

अफूची गोळी

घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते.

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी

नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण
येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन
कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम
सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण

हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी
काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
जानेवारी 1, 2016

वरचढ

खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ...

प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
     स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी

चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
     तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद

अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
     शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान