जानेवारी 20, 2012

शेवटची भेट

मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात "मी तुझ्याकडे 'तशा' नजरेने कधी पाहिलंच नाही" ह्या विधानाची जबरदस्त धास्ती असते. आणि मग एकदा का हे विधान ऐकावं लागलं तर ती मैत्री तरी अबाधित राहू शकते का?

...
नकार दिलास तू आणि आपल्यातला मोकळेपणा संपला
जोर लावून उघडला की जसा दुभंगून जातो शिंपला
भेटी संपल्या आपल्या काही कारणच नव्हतं मिळत
आणि खरं सांगू? कारण मिळालं तरी भेटायचं मीच होतो टाळत
...
जानेवारी 4, 2012

बी पी

रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर किंवा बीपी हा धकाधकीच्या शहरी जीवनाने आपल्याला दिलेला शाप आहे. कोणत्याही वाईट सवयी शेवटी रक्तदाबाला आमंत्रण देणाऱ्या ठरतात. रक्तदाबाला कारणं अनेक पण विचार करा की ही सारी कारणं एकाच व्यक्तीच्या वाट्याला आली तर ...?!

डॉक्टर मला विचारत होते झालंय तरी काय
कसलं एवढं टेन्शन घेता बीपी झालंय हाय

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/DkiShkgFsSg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 15, 2011

सैनिक

(ही कविता २०१२ साली 'पुढचं पाऊल' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे. )

बांगलादेशच्या युद्धाला चाळीस वर्षं झाली. भारताच्या दृष्टीने ती 'मदत' होती; पाकिस्तानकरता ती 'घुसखोरी' होती; तर बांगलादेशकरता तो 'स्वातंत्र्यलढा' होता. पण ह्या युद्धाचं चर्वितचर्वण करताना त्यात तिन्ही देशांच्या मिळून मृत्युमुखी पडलेल्या ४०,००० सैनिकांचा विचार कोणी करतंय का?

मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

तरुण पत्नी तुझ्या विचारी बसली झुरत असेल
अंध आईच्या घशामधुनी घासही सरत नसेल
उभे पिक ते कापणीविना झाले असेल खाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/y3_iUpzX8hA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 2, 2011

शहर

ही कविता २०११ साली सकाळ प्रकाशनाच्या 'शब्ददीप' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.

ग्रामीण भागातील समस्यांचा रामबाण उपाय म्हणून शहरांकडे बघितलं जातं. आणि मग गावातून शहरात येणारे लोंढे वाढतच जातात. आपल्या आई-वडिलांनी बहुतेक तेच केलं. पण सुव्यवस्था कोलमडलेल्या ह्या नगरांमध्ये गावातून येणारा माणूस खरच सुखी होतो का?

दहा बाय बाराची लहानशी खोली
     म्हातारीचा बिछाना बाळाची झोळी
मुलांचा अभ्यास बायकोचा स्वयंपाक
     तिथेच झोपतो करून अंगाची मोळी

झोपलो तरी असतो निदान पसरून पाय
     गाव सोडून मी मिळवलं काय?
नोव्हेंबर 18, 2011

रफू

आपण बोलताना बरेचदा 'क्यायच्या क्याय!' विधानं करून बसतो आणि मग त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं ते आपल्याला समजत नाही. असे फाटलेले संवाद रफू करून देणारा एखादा शिंपी मिळाला तर त्याला कामाचा कधीही तुटवडा पडणार नाही. एका राजाला असा शिंपी मिळाला आणि त्याने त्या राजाची कशी मदत केली ते वाचा 'रफू' ह्या काव्यकथेत ...

राजाच्या दरबारी आला कलाकार तो करी सलाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम

राजा म्हणतो त्याला
     असती मम दरबारी
शिंपी निपुण प्रभारी
     शिवणकला ती सारी

मला सांग मी तुजला
     कशास ठेवू जवळ
शिवणकला ती सकल
     त्यात काय ते नवल

शिंपी म्हणतो कपडे नाही रफू करीन मी बोल तमाम
शिवणकलेचे घेईन दाम रफू करीन ते माझे काम
नोव्हेंबर 4, 2011

तारीख

११.११.११ ही तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा काही सुरस आणि चमत्कारिक बातम्या ऐकायला मिळत आहेत. जन्माची संभाव्य तारीख अगोदरची असेल तर जोडपी डॉक्टरांना प्रसूती पुढे ढकलण्याचे उपाय विचारात आहेत. नंतरची असेल तर त्या दिवशी सिझेरिअन करायला सांगत आहेत. समारंभांच्या कार्यालयांचे त्या दिवसाचे दर दुप्पट तिप्पट झाले आहेत. आपल्या आयुष्यात तारखेचं महत्व खरच किती आहे नाही!

पटवून देण्या खरच तुमचा जन्म आहे झाला
जन्माच्या त्या दाखल्यावरती आधी तारीख घाला
वाढदिवसाची तारीख घालते आनंदाशी सांगड
तारखा असतात आयुष्यातील मैलाचे दगड
ऑक्टोबर 21, 2011

अनाथ

आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या हातून घडलेल्या घोडचुकीचे परिणाम जर त्या व्यक्तीला भोगावे लागले तर आपण 'करावे तसे भरावे' असं म्हणून मोकळे होतो. पण त्याच चुकीचे परिणाम जर इतरांना भोगावे लागले तर त्याला काय म्हणावं ...?

घरी जाऊनी मला म्हणाला बाळा ही बघ आई
मला पाहुनी मान फिरवली शब्दही वदली नाही
चेहरा तिचा पाहुनी मनी ह्या प्रकाश पडला लक्ख
केवळ योगायोगे त्याने मला निवडले नाही

जन्माला घातले मला पण आठवण आली आज
मला बनविले अनाथ तेव्हा कसला होता माज
आज स्वतःला मुल नसे तर उरावरी पत्नीच्या
मला बसवितानाही त्याला वाटत नव्हती लाज

सोडून दिधले मला जगाच्या अमानवी रानात
दुनिया काही म्हणो मला पण आहे मी अनाथ
ऑक्टोबर 7, 2011

प्रश्न

सणासुदीचे दिवस म्हणजे घरी देव-देवतांचा उल्लेख होणं ओघानेच आलं. अशा वेळी मोठ्या माणसांना न पडणारे प्रश्न लहान मुलांना साहजिकपणे पडतात. त्यात सुट्ट्या सुरु झाल्या की मग तर प्रश्नांना ऊत येतो. पहा ह्या प्रश्नांची उत्तरं देणं जमतंय का ...

आंघोळ सूर्यदेवाला आहे का हो माफ?
     पाणी घेतलं अंगावर तर नुसतीच होईल वाफ

शंकराला नाद लागला वाचन करण्याचा
     कसा मिळेल चष्मा त्याला तीन डोळ्यांचा?
सप्टेंबर 16, 2011

वास्तुपुरूष

"... एकनाथ सावधपणे उठला तरीही बाजेने बरीच कुरकुर केली आणि त्यामुळेच की काय आतले आवाज एकदम बंद झाले. दोन खोल्यांच्या मध्ये एक खिडकी होती. एकनाथ पायांचा आवाज न करता त्या खिडकीजवळ गेला. खिडकीला बाहेरून गज होते.  ... "