मे 6, 2011

आळस

१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो ... म्हणजेच काम करणाऱ्यांचा दिवस. त्यामुळे ह्या दिवशी माझ्यासारख्या आळशी माणसांना कुठे लपावं ते समजत नाही. माझे कामसूपणाबद्दलचे काही 'प्रांजळ' विचार 'आळस' ह्या कवितेद्वारे मांडत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते पटतील ह्यात मला शंका नाही. १ मे बद्दल लिहिलेली कविता इतक्या उशिरा का? कारण अर्थातच ... 'आळस'!

पुसती मला ते कामापासून
     दूर का तू पळशी
जग सारं काम करतं
     असा कसा तू आळशी

माझं म्हणणं काम मला जर
     समोर दिसलंच नाही
तर त्याच्यापासून दूर पळायचा
     प्रश्नच येत नाही

कामं करण्यासाठी लागते लोकांची का चुरस
माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे आळस
एप्रिल 15, 2011

निसर्ग

२२ एप्रिल हा दिवस 'जागतिक पृथ्वीदिन' (International Earth Day) म्हणून साजरा होतो. सध्याच्या विज्ञानाच्या मर्यादांमुळे निदान नजीकच्या भविष्याततरी आपल्यासमोर पृथ्वी ग्रह सोडून दुसरा कोणताही विकल्प उपलब्ध नाही. आपल्यासारख्या शहरातल्या किड्यांना आपल्या सभोवतालचं काँक्रिटचं जंगल म्हणजेच पृथ्वी वाटली तर त्यात नवल नाही. पृथ्वीवरील निसर्गाचं सौंदर्य आणि ऐश्वर्य केवळ काव्यामध्येच राहणार नाही ना? असंच एक निसर्गावरील काव्य, पहा आवडतंय का ते ...

मेघ नभी थरथरले
सर सर पाणी झरले
नदी नालेही भरले   
     सचैल भिजली धरा
कोंब नवे अंकुरले
हिरव्या रंगी मुरले 
नवीन जीवन स्फुरले
     चमत्कार तो खरा

छाया वटवृक्षाची
अन् पाती गवताची
फळे भिन्न स्वादाची
     काय अहो आश्चर्य
विहरत गगनी पक्षी
हरीणकांतीची नक्षी
श्वास अडकला वक्षी
     पाहून ते सौंदर्य
एप्रिल 1, 2011

वर्ष २०००

भारताने क्रिकेट विश्वचषकात थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्यामुळे आज १९८३च्या विश्वचषकाची आठवण येणं साहजिक आहे. त्या ऐतिहासिक गोष्टीला आता तब्बल २८ वर्ष होऊन गेली आहेत. मनात सहज एक विचार आला, काय करत होतो आपण २८ वर्षांपूर्वी? त्या विचारांनीच रूप घेतलं ह्या 'वर्ष २०००' कवितेचं. पाहा पटतेय का.

दोन हजार साली आपण गाठली असेल तिशी
गालांवरती दाढी असेल ओठांवरती मिशी
अभ्यास नाही शाळा नाही आभाळ सारं खुलं
पण लग्न झालं असेल आपलं आणि असतील मुलं
नुसत्या कल्पनांनीसुद्धा लाजून जायचो पार
दूर किती वाटत होतं वर्ष दोन हजार
मार्च 18, 2011

शिकवण

२१ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय वर्णभेदविरोधी दिन' म्हणून पाळला जाणार आहे. भारताला वर्णभेदाची लागण जरी झाली नसली तरी जातीयवादाची पाळंमुळं फार खोलवर पसरलेली आहेत. २१ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय कविता दिन'सुद्धा असल्यामुळे ह्या विषयावर आधारित माझी 'शिकवण' ही कविता सादर करत आहे.
 
स्वामीजींच्या मनात होता विचार काही नेक
     युवराजाला ठेवून घेण्या कारण होते एक
राजाच्या त्या राज्यामध्ये गेले होते स्वामी
     जनतेमध्ये दिसे तयांना दुःखाचा अतिरेक
 
जातीयतेला उधाण जागोजागी अस्पृष्यता
     मनामनातील भिंतींना ते राज्य देई मान्यता
भेदभाव तो पाहून झाले स्वामीजी विदीर्ण
     शिक्षण दिधले युवराजाला सर्वश्रेष्ठ मानवता
फेब्रुवारी 18, 2011

आई

८ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून पाळला जाणार आहे. आपल्या आयुष्यात येणारी पहिली महिला म्हणजे आपली आई. आईच्या आपल्या अपत्यावर असलेल्या निस्सीम, निर्भेळ, निर्व्याज प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. पण आपण आपल्या आईच्या प्रेमाला तितकाच उत्कट प्रतिसाद देतो का? सादर आहे काव्यकथा 'आई'.
 
आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
 
घर आणि शाळा सोडून जगच मजला नव्हतं
घरात आम्ही दोघंच आणि तिसरं कुणीही नव्हतं
किती होती कुरूप तिजला नव्हता हो अंदाज
एकमेव त्या डोळ्याची पण मलाच वाटे लाज
 
तिला बोलणं घालून पाडून हाच माझा चाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
फेब्रुवारी 12, 2011

क्रिकेट आणि युद्ध

क्रिकेटला जर धर्म मानला तर विश्वचषक स्पर्धेला कुंभमेळा किंवा हजची यात्रा म्हणायला हरकत नसावी. विशेषतः मराठी मनाला तर क्रिकेट म्हणजे अगदी कबड्डी किंवा खोखोइतका जवळचा खेळ. क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबद्दलचे माझे विचार कवितेच्या रूपाने मांडायचा प्रयत्न करत आहे.

लारा, वॉर्न, मुरली पाहून चढतो आम्हा चेव
हिरो आमच्याकरता धोनी, सुनील, कपिल देव
क्रिकेटच्या प्रेमाला आमच्या नसते कुठली हद्द
क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन असतो देव

असा विचार करणाऱ्यांच्यात असतात आबालवृद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध
फेब्रुवारी 4, 2011

चतुर कुत्रा

जंगलात हरवलेल्या कुत्र्याच्या अगदी जीवावर बेतलं होतं. पण आपला चतुरपणा वापरून कुत्र्याने - एकदा नाही तर दोनदा - आपली सुटका कशी करून घेतली त्याची ही गोष्ट.

दाट जंगलामध्ये हरवून
     गेला एक कुत्रा
डोक्याने तो चतुर जरी
     होता थोडा भित्रा

वाट चुकला होता सापडत
     नव्हता त्याला माग
दिसला त्याला येताना
     तिथून ढाण्या वाघ
फेब्रुवारी 4, 2011

मोबाईल फोन

ही कविता वर्षं भावे ह्यांनी संगीत देऊन ‘अल्लड’ ह्या अवंती पटेलने गायलेल्या गीतसंचात समाविष्ट केली आहे.

आधी यंत्रयुग आणि मग संगणकयुगामुळे मानवाच्या सुविधा वाढत गेल्या आणि मग माणूस अधिकाधिक ह्या उपकरणांचा गुलाम होत गेला. सध्याचं युग आहे उपकरणांच्या सूक्ष्मीकरणाचं आणि ह्या युगाचा बिनीचा शिलेदार आहे भ्रमणध्वनी, अर्थात मोबाईल फोन. दूरध्वनी, घड्याळ, टीवी, कॅल्क्युलेटर, संगणक, संगीत प्रणाली, कॅमेरा वगैरे उपकरणं ह्या little championने आधीच गिळंकृत केली आहेत. आता घरातून बाहेर जाणारी व्यक्ती एकवेळ पैशांशिवाय राहू शकेल, पण मोबाईलशिवाय... अशक्य!

आधी तिच्याशी मैत्रीचे जुळवावयास धागे
     कोपऱ्यावरती तासंतास उभं राहावं लागे
आता एसेमेसनेच दिलं घेतलं जातं दिल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल

आजूबाजूला पाहा तुम्हाला लगेच दिसून येर्इल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल
फेब्रुवारी 4, 2011

बिस्किटाचा पुडा

तिऱ्हाईतांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा आपला दृष्टीकोन असतो. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की अनोळखी व्यक्तींवर भरवसा ठेवू नये. पण कधी कधी काही अनोळखी व्यक्तीच आपल्याला आयुष्यातील काही मौलिक धडे शिकवून जातात.

एक मनुष्य बसला होता
     पलीकडच्या खुर्चीवर
एक बिस्कीट त्यानेसुद्धा
     घेतलं माझ्यानंतर

आश्चर्याने त्याच्याकडे
     वळून मी पाहिलं
मान झुकवून त्याने मला
     स्माइल एक दिलं