एप्रिल 4, 2016

काळजी घे

माणूस समूहात राहणारा प्राणी असल्यामुळे बरेचदा त्याच्याकरता मुंग्या, पक्षी, मासे अशा समूहात राहणाऱ्या प्राण्यांची उपमा वापरली जाते. मात्र माणूस हा ह्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी भिन्न प्राणी आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव असते. त्यामुळे माणसाकरता आपल्या समूहाच्या संरक्षणाएवढंच स्वतःचं वैयक्तिक संरक्षणही महत्वाचं असतं...

तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे
     तुझ्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे
पृथ्वीवरील जीवसृष्टी पुढे नेणं हे तुझं लक्ष्य नव्हे
     तुझं जगणं केवळ भक्षक किंवा केवळ भक्ष्य नव्हे

तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे
तुझं एकच आयुष्य आहे
          काळजी घे
मार्च 18, 2016

नव्याण्णववासी

तीन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या बऱ्याच जणांना चार खोल्यांच्या घराची आस असते. त्याच वेळी काही जण दोन खोल्यांच्या घरातही सुखाने नांदतात. असण्या / नसण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला हा विसंवाद दिसून येतो. ह्याला कारण म्हणजे आपण बहुतेक सगळेच 'नव्याण्णववासी' आहोत . . . 

राजा होता एक 		स्वामींपाशी आला
होता मोठा नेक 		पण दुःखी होता झाला

माझ्यापाशी छान 	सुखसंपत्ती सारी
तरीही समाधान		नाही मनाच्या दारी

स्वामी थोडे हसले 	हळूच आपुल्या गाली
राजासमोर बसले 	नजर तयाच्या भाळी

चिंता तुझ्या मनाशी 	आहे त्याच्या मागे
तू नव्याण्णववासी 	कारण आहे साधे
मार्च 4, 2016

सोयीस्कर देशभक्ती

आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना?

त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला
     व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला

प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट
     देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत

देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील
     उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
फेब्रुवारी 5, 2016

नरक

सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं...

 देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी
पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले

पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
          हा तर आहे नरक
जानेवारी 15, 2016

अफूची गोळी

घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते.

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी

नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण
येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन
कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम
सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण

हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी
काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
जानेवारी 1, 2016

वरचढ

खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ...

प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी
     स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी

चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद
     तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद

अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान
     शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान
डिसेंबर 18, 2015

माकड आणि माणूस

माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात

खोलीमध्ये शिडी एक
    उभी होती केली
हुशार एका माकडाची
    नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
    केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
    शिडीवर तू चढ

माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
डिसेंबर 4, 2015

पोटचा गोळा

"परत मुलगीच झाली . . . अरेरे!" हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का?

होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती
कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक
दुसऱ्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक

तिसऱ्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी
आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 20, 2015

आठवणी

भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो ...

मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ

उशिरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
     आठवणी राहून जातात