व्हरांड्यात उभा होतो न्याहाळत रात्रीचा देखावा तो रम्य
मनात उठलं होतं आठवणींचं काहूर अदम्य ॥
ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद
शरीराला सुखावत होता शीतल वारा झुळझुळता मंद ॥
माझ्या शेजारी उभी राहून तीही डोळ्यांनीच पीत होती पौर्णिमेची ती रात
कसला विचार करतोयस एवढा मला म्हणाली घेऊन हातात माझा हात ॥
म्हटलं आठवतंय असाच उगवला होता त्याही दिवशी पौर्णिमेचा चांद
आणि भावना झाल्या होत्या अनावर भेदून मनाचे बांध ॥
बिलगून मला म्हणाली वाटलं होतं विसरला असशील तू बहुदा
थोडीथोडकी नाहीत त्या गोष्टीला झाली आहेत वर्षं चांगली चौदा ॥
म्हटलं सखे, कोरली आहे ती रात्र माझ्या मनात अगदी करकरीत कोरी
पकडली होती तुझ्या वडिलांनी ज्या रात्री आपल्या भेटीगाठींची चोरी ॥
काही केल्या तयार नव्हते माझी धरलेली मानगूट सोडायला
म्हणाले लग्न कर हिच्याशी नाहीतर पाठवतो तुरूंगात खडी फोडायला ॥
खळखळून हसत ती आणखीन बिलगली मला तरी माझा चेहरा गंभीर
कधीपासून बोलायचं होतं ते बोलून गेलो जरी आता झाला होता उशीर ॥
तेव्हाच नीट विचार केला असता तर असा फसलो नसतो गं
चौदा वर्षं झाली बरोब्बर आज जन्मठेपेतून सुटलो असतो गं ॥