कविता
व्यक्तिवाचक
आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात ज्यापैकी ‘व्यक्ती’ म्हणता येतील अशी फार थोडी – जी आपल्या मनावर एक अमिट ठसा उमटवून जातात. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या ह्या व्यक्तींचे आपल्यावर अनंत उपकार असतात. अशाच काही व्यक्तींवर आधारित ह्या कविता.
जून 2, 2018
“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं... त्याच भिंती त्याच खोल्या त्याच जागा दिसती डोळ्यां त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू पण तिथे नसणार तू || त्याच खुर्च्या तेच टेबल पुस्तकांवर तेच लेबल आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू पण तिथे नसणार तू ||
फेब्रुवारी 26, 2018
भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता.... केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला ||
ऑगस्ट 19, 2016
काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार ... गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी ... जणू श्रावण आला ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी ... एकाच वेळी अतिभव्य ब्रह्माण्डाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात शब्दांना एवढं वजन असतं ... ठाऊक नव्हतं शब्दांना रंग आकार स्पर्श असतो ... ठाऊक नव्हतं शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे शब्द श्वास घेतात ... ठाऊक नव्हतं
नोव्हेंबर 6, 2015
आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ... तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ? तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का? इतकी कशी रागावलीस आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 17, 2015
शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . . डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे
ऑक्टोबर 17, 2014
राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . . सतत खोड्या काढल्या तरी पाठवणीची वेळ येताच कोपऱ्यात बसून आपले डोळे पुसणारा एक भाऊ असावा अरेतुरेची सलगी साऱ्या मोठ्यांकरता चालत नाही मुलांकडून मामा म्हणवून घेणारा एक भाऊ असावा आपलं सुख आपलं मानून घेणारा एक भाऊ असावा आपल्या दुःखात ठाम उभा राहणारा एक भाऊ असावा