‘आजची आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ह्यापूर्वी कधीतरी घडलेली असते. आयुष्य हे रुळावरून धावणाऱ्या आगगाडीप्रमाणे असतं असं गृहीत धरून आपण जगत असतो. आयुष्याला कलाटणी देणारे बदल केवळ इतरांच्या बाबतीत घडतात असा आपला ठाम समज असतो. इतरांकरता आपण ‘इतर’ असतो हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे एखादी अघटित घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण मुळापासून हादरून जातो. आपल्या बाबतीतही असं घडू शकतं ह्या साक्षात्कारामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलून जातो.’
... संदीप दांडेकर यांनी इतिहास, मानसशास्त्र, विज्ञान व तत्त्वज्ञान अशा विषयांचा आधार घेऊन कल्पित घटनांचा विस्तार करीत ‘अघटित’ या कथासंग्रहातील कथा फुलविल्या आहेत… मुलगा विहिरीत पडलेल्या शेतकऱ्याची मानसिकता, कौटुंबिक स्थिती व रोजचे कष्टमय जगणे जिल्हा दंडाधिकारी सत्येंद्रकुमारला ‘विहीर’मधून समजते... ‘रक्षण’ ही कथा अतिशय उत्कंठापूर्ण आहे. ‘लिव-इन’मध्ये प्रताप, नीलिमा व सतीशच्या मैत्रीची गोष्ट शेवटी वेगळे वळण घेते. तक्षशीला अंतराळ वसाहतीतील चैतन्य व स्वेतलानाची कहाणी, परांजपे वाड्याच्या ‘खोली’चे रहस्य वाचताना थरार जाणवतो. इतर कथा वाचताना त्यातील वेगळेपण जाणवते.
'अघटित' काल वाचून काढले. Overall an engaging book!
... विज्ञान, इतिहास, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांवर आधारित काल्पनिक घटना संदीप दांडेकर यांनी १२ कथांमधून शब्दबद्ध केल्या आहेत. ‘लिव-इन’मधले प्रताप व नीलिमा, ‘मिती’मधील दीपिका व अजिंक्य, ‘बाइक’मधील मिलिंद, ‘कळस’मधील अरविंद, अर्जुन यांनी अशीच काही अघटिते अनुभवली. अघटित अनुभवताना कुणीही मुळापासून हादरून जाईल. या कथाही अशाच हादरवणाऱ्या, धक्का देणाऱ्या आहेत. या कथेतील पात्रे आपल्या आसपास असणारी आणि आजच्या काळातील आहेत. त्यामुळे कथा परिणामकारक झाल्या आहेत.
माणसाचे मन किती रहस्यमय आहे याचा प्रत्यय 'विहीर' ही कथा वाचताना येतो. पोटचा गोळा काही दिवसांनी जगेल की नाही हे समोर दिसत असताना आपल्या इतर परिवाराकरता तो प्रश्न विचारणारा पांडू दोषी की निर्दोष? मानवी मनाची ही परिस्थिती अगदी सुन्न करून जाते.