केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ
दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ
काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ
दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || १ ||
सुसंस्कृतीवर कलंक आणि मानवतेची चेष्टा
खच्चीकरण हो मनाचे कसे सततची पराकाष्ठा
तुरूंगात त्या रात्री सोबत करी मानवी विष्ठा
स्वतंत्रता होमाचा प्रसाद म्हणूनी आलिंगिला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || २ ||
कोलू ओढून गुराप्रमाणे रक्तबंबाळ मान
दोऱ्या वळता हाती पडतो नसानसांवर ताण
ऐकुनी अभद्र बोल सततचे विषण्ण झाले कान
येतील आपुले दिवस म्हणोनी प्रमाद पत्करला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ३ ||
सोबतीस अपराधी मोठे खुनी दरवडेखोर
त्यातच होते खितपत पडले बंधू त्यांचे थोर
साऱ्यांपासून दूर ठेविले एकांतवास घोर
सहस्र कवितांचा संग्रह मग पाठ करूनी रचला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ४ ||
स्वस्थ बसावे असा कधी ना आला मनी विचार
परधर्माच्या कांडावरती केला जबर प्रहार
कारागारातही योजीला विद्येचा प्रसार
सर्वसामान्य बंद्यांमध्ये राष्ट्रधर्म पसरवला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला || ५ ||
2 Comments
” सागरा प्राण तळमळला ” – असं सागराला उद्देशून भावाकुल होऊन म्हणणा-या स्वा. सावरकरांचे अंदमानच्या तुरुंगातील यातनामय जीवन तुमच्या कवितेतून छान शब्द बद्ध झाले आहेत.
स्वातंत्र्यानंतरही त्यांची अवहेलनाच झाली ही खंत…. मनःपूर्वक धन्यवाद!