मार्च 18, 2011

शिकवण

२१ मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय वर्णभेदविरोधी दिन' म्हणून पाळला जाणार आहे. भारताला वर्णभेदाची लागण जरी झाली नसली तरी जातीयवादाची पाळंमुळं फार खोलवर पसरलेली आहेत. २१ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय कविता दिन'सुद्धा असल्यामुळे ह्या विषयावर आधारित माझी 'शिकवण' ही कविता सादर करत आहे.
 
स्वामीजींच्या मनात होता विचार काही नेक
     युवराजाला ठेवून घेण्या कारण होते एक
राजाच्या त्या राज्यामध्ये गेले होते स्वामी
     जनतेमध्ये दिसे तयांना दुःखाचा अतिरेक
 
जातीयतेला उधाण जागोजागी अस्पृष्यता
     मनामनातील भिंतींना ते राज्य देई मान्यता
भेदभाव तो पाहून झाले स्वामीजी विदीर्ण
     शिक्षण दिधले युवराजाला सर्वश्रेष्ठ मानवता
फेब्रुवारी 18, 2011

आई

८ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून पाळला जाणार आहे. आपल्या आयुष्यात येणारी पहिली महिला म्हणजे आपली आई. आईच्या आपल्या अपत्यावर असलेल्या निस्सीम, निर्भेळ, निर्व्याज प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. पण आपण आपल्या आईच्या प्रेमाला तितकाच उत्कट प्रतिसाद देतो का? सादर आहे काव्यकथा 'आई'.
 
आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
 
घर आणि शाळा सोडून जगच मजला नव्हतं
घरात आम्ही दोघंच आणि तिसरं कुणीही नव्हतं
किती होती कुरूप तिजला नव्हता हो अंदाज
एकमेव त्या डोळ्याची पण मलाच वाटे लाज
 
तिला बोलणं घालून पाडून हाच माझा चाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा
फेब्रुवारी 12, 2011

क्रिकेट आणि युद्ध

क्रिकेटला जर धर्म मानला तर विश्वचषक स्पर्धेला कुंभमेळा किंवा हजची यात्रा म्हणायला हरकत नसावी. विशेषतः मराठी मनाला तर क्रिकेट म्हणजे अगदी कबड्डी किंवा खोखोइतका जवळचा खेळ. क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबद्दलचे माझे विचार कवितेच्या रूपाने मांडायचा प्रयत्न करत आहे.

लारा, वॉर्न, मुरली पाहून चढतो आम्हा चेव
हिरो आमच्याकरता धोनी, सुनील, कपिल देव
क्रिकेटच्या प्रेमाला आमच्या नसते कुठली हद्द
क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन असतो देव

असा विचार करणाऱ्यांच्यात असतात आबालवृद्ध
क्रिकेट म्हणजे असतं आमच्यासारख्यांकरता युद्ध
फेब्रुवारी 4, 2011

चतुर कुत्रा

जंगलात हरवलेल्या कुत्र्याच्या अगदी जीवावर बेतलं होतं. पण आपला चतुरपणा वापरून कुत्र्याने - एकदा नाही तर दोनदा - आपली सुटका कशी करून घेतली त्याची ही गोष्ट.

दाट जंगलामध्ये हरवून
     गेला एक कुत्रा
डोक्याने तो चतुर जरी
     होता थोडा भित्रा

वाट चुकला होता सापडत
     नव्हता त्याला माग
दिसला त्याला येताना
     तिथून ढाण्या वाघ
फेब्रुवारी 4, 2011

मोबाईल फोन

ही कविता वर्षं भावे ह्यांनी संगीत देऊन ‘अल्लड’ ह्या अवंती पटेलने गायलेल्या गीतसंचात समाविष्ट केली आहे.

आधी यंत्रयुग आणि मग संगणकयुगामुळे मानवाच्या सुविधा वाढत गेल्या आणि मग माणूस अधिकाधिक ह्या उपकरणांचा गुलाम होत गेला. सध्याचं युग आहे उपकरणांच्या सूक्ष्मीकरणाचं आणि ह्या युगाचा बिनीचा शिलेदार आहे भ्रमणध्वनी, अर्थात मोबाईल फोन. दूरध्वनी, घड्याळ, टीवी, कॅल्क्युलेटर, संगणक, संगीत प्रणाली, कॅमेरा वगैरे उपकरणं ह्या little championने आधीच गिळंकृत केली आहेत. आता घरातून बाहेर जाणारी व्यक्ती एकवेळ पैशांशिवाय राहू शकेल, पण मोबाईलशिवाय... अशक्य!

आधी तिच्याशी मैत्रीचे जुळवावयास धागे
     कोपऱ्यावरती तासंतास उभं राहावं लागे
आता एसेमेसनेच दिलं घेतलं जातं दिल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल

आजूबाजूला पाहा तुम्हाला लगेच दिसून येर्इल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल
फेब्रुवारी 4, 2011

बिस्किटाचा पुडा

तिऱ्हाईतांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा आपला दृष्टीकोन असतो. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की अनोळखी व्यक्तींवर भरवसा ठेवू नये. पण कधी कधी काही अनोळखी व्यक्तीच आपल्याला आयुष्यातील काही मौलिक धडे शिकवून जातात.

एक मनुष्य बसला होता
     पलीकडच्या खुर्चीवर
एक बिस्कीट त्यानेसुद्धा
     घेतलं माझ्यानंतर

आश्चर्याने त्याच्याकडे
     वळून मी पाहिलं
मान झुकवून त्याने मला
     स्माइल एक दिलं
फेब्रुवारी 4, 2011

बदलू नकोस

लग्नाआधी एकमेकांना भेटायला जाताना प्रियकर आणि प्रेयसी सिंड्रेला बनून जातात. आणि मग लग्नाचे बारा वाजले की बग्गीचा भोपळा आणि घोड्यांचे उंदीर होतील की काय अशी सतत भीती वाटत राहते. म्हणूनच ह्या प्रियकराचं आपल्या प्रेयसीकडे एकच मागणं आहे ...

भेटतो जेव्हा तुला माझं प्रसन्न होतं मन
     असणं तुझं सुवास आणि हसणं सूर्यकिरण
जग वाटतं निर्मळ आणि जगणं वाटतं सोपं
     अशक्य गोष्टींवरचं तुटतं अशक्यतेचं बंधन

आयुष्य माझं उजळवणं हे थांबवू नकोस तू
     एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू
फेब्रुवारी 4, 2011

आई नावाचं मशीन

मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येतं की घरातील कामं आपण केल्याशिवाय होत नाहीत. मग वाटतं की लहानपणी ही कामं कशी अपोआप व्हायची. ह्याला कारण म्हणजे प्रत्येक घरात असतं एक आई नावाचं मशीन. हे मशीन कधी दमत नाही कधी थकत नाही आणि कधी कुरकुरतही नाही. पण मग हे मशीन चालतं तरी कशावर?

काल माझ्या घरी आल्या मैत्रिणी चिकार
     खूप पसारा केला आणि झाल्या मग पसार
आवर पसारा म्हंटलं म्हणजे येतो मजला शीण
     आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन
फेब्रुवारी 4, 2011

शून्य

मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भारताचं योगदान 'शून्य' आहे! कारण मानवी इतिहासातील सर्वात जास्त क्रांतिकारी मानल्या जाणाऱ्या शोधांपैकी एक अशा शून्याचा शोध भारतात लावला गेला. संपूर्ण विज्ञान ह्या एका शून्यावर आधारित आहे. आणि क्लिष्ट होत जाणारं विज्ञान जसजसं तत्वज्ञानाच्या जवळ जात आहे तसतसं तत्वज्ञानातीलही शून्याचं महत्व अधिकाधिक जाणवू लागलं आहे.

आपल्याला एखादी भौतिक वस्तू जेव्हा दिसते
     संदर्भाला आजुबाजूस दुसरे काही असते
परमेश्वर जर ब्रह्मांडाच्या चराचरातून वसतो
     दिसेल कसा तो कोणालाही संदर्भच जर नसतो

शून्यत्वाचं रूप र्इश्वरी झालं म्हणूनच मान्य
     अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mC5SjpZlGq0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

पहिली गाडी

मध्यमवर्गीयांमध्ये दोन ठळक उपवर्ग आहेत - एक ज्यांच्याकडे गाडी नाही तो आणि दुसरा अर्थातच ज्यांच्याकडे आहे तो. टीवी, फ्रीज, फोन आता सगळ्यांकडे असतात. पण गाडीचं तसं नाही. गाडी असणं म्हणजे श्रीमंतीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल. पहिल्या उपवर्गाची दुसऱ्यात जाण्याकरता नेहेमीच धडपड सुरु असते. आणि मग जेव्हा पहिली गाडी घरी येते तेव्हा त्या गाडीचं अप्रूप पुढे आयुष्यभर वाटत राहिलं नाही तरच नवल.

पहिला चरा पडला त्यावर
     घासून गेली बस
अन्न पाणी बेचव झालं
     आठवतोय दिवस

नंतरसुद्धा बरेच झाले
     आघात तिच्यावर
पण पहिला चरा पडला होता
     माझ्या काळजावर

अजून शिव्या ड्रायवरच्या त्या नावाने मी घालतो
     माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो
फेब्रुवारी 4, 2011

नगण्य

मी, मला, माझं, माझ्यामुळे, माझ्यासाठी, माझ्यावर, माझ्याकरता ... मनुष्याच्या अहंभावाला काही सीमा नाही. जिथे न फिरणारा भोवरा आधाराशिवाय जमिनीवर उभा राहील एवढ्या सूक्ष्म शक्यतेवर सारी जीवसृष्टी टिकून आहे, तिथे त्या जीवसृष्टीचा एक हिस्सा असलेल्या मानवजातीचा काय पाड! ब्रह्मांडाच्या विस्तारापुढे आपण किती कःपदार्थ आहोत ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर ह्या अहंभावामुळे निर्माण झालेले कित्येक प्रश्न सुटू शकतील ह्याबाबत कुणाला शंका राहणार नाही एवढं नक्की!

वर्षं झाली तेरा अब्ज आणि सत्तर कोटी
     इतक्या पूर्वीपासून सॄष्टी अस्तित्वात होती
केवळ दोन लक्ष वर्षांपूर्वी अवतरलास
     आहे तुझी कारकीर्द ह्मा भूतलावर छोटी

फार पूर्वी सुटला आहे समयाचा तो बाण
     भानावर ये माणसा आहेस नगण्य किती ते जाण
फेब्रुवारी 4, 2011

एकच मजला सांग …

स्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं ...

निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
     निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
     तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
     नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग