नोव्हेंबर 1, 2013

परतफेड

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये छेड काढण्याचा मक्ता पुरुषांनी घेतला आहे. मात्र हे असं कुठपर्यंत चालणार? दिवसेदिवस सबल होणाऱ्या महिलांना पूर्वापार चालत आलेल्या ह्या फाजीलपणाची परतफेड करावीशी वाटत नाही का?

एकटा घरी जात असावा तो पावसाळी रात्री
त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे असावी छत्री
चिंब त्याची काया धुंद माझ्या गात्री
     असं मुलींना कधीच वाटत नाही का?

खुरट्या दाढीने भरलेले त्याचे गाल
मस्त मर्दानी त्याची रुबाबदार चाल
काय साला मस्त आहे माल
     असं मुलींना कधीच वाटत नाही का?
ऑक्टोबर 18, 2013

दुःख

१७ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रसंघाने 'जागतिक गरिबी निर्मुलन' दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने भारतात बऱ्याच जणांना अचानक गरीब दिसू लागले आहेत आणि गरिबीची जाणीव होऊ लागली आहे. गरिबी हेच जगातील दुःखाचं मुख्य कारण आहे. पराकोटीला पोहोचलं की शेवटी ह्या दुःखाचाच अभिमान मग मनात उरतो . . .

हेलावून मी गेलो पाहून दुःखाचे ते माप
     डोळ्यांमध्ये आणि दाटला माझ्या मग संताप
मागेपुढे नाही पाहिले धावून त्यावर गेलो
     अनावर मी झालो होतो मारले त्यास अमाप

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/XykWLdJfMEM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 4, 2013

मॉर्निंग वॉक

सकाळचा फेरफटका, अर्थात morning walk ही आरोग्याकरता अत्यंत चांगली गोष्ट आहे . . . आणि 'आरोग्याकरता अत्यंत चांगल्या' अशा इतर गोष्टींप्रमाणेच बोलायला सोपी पण करायला कठीण गोष्ट आहे. आपल्यातील किती जणांनी किती वेळा morning walkचा 'दृढ संकल्प' केला असेल ह्याचा हिशेब ठेवायला संगणकाची गरज लागेल . . . 

सगळे म्हणती दाखवून बोट
तुझं सुटलं आहे पोट
त्यांच्या बोलण्यात नाही खोट

चालीन चांगला मी भरभर
     उद्या उठणार मी लवकर
सप्टेंबर 20, 2013

उपरा

लोकशाही म्हणजे बहुमताचा मान . . . पण मग बहुमताने अराजक माजलं तर त्याचाही मान ठेवायचा का? माझ्या सभोवती बहुतांश लोक जर मग्रुरी, लबाडी, अस्वच्छता, असहिष्णुता, भ्रष्टाचार ह्या गोष्टींचा पुरस्कार करत असतील तर मीसुद्धा त्यांच्यासारखं बनावं का? आणि नाही बनलो तर मी ह्या देशात राहायला नालायक ठरतो का?

रस्त्यांमध्ये मांडव
     दिवसरात्रीचे तांडव
रांगा लावून दर्शन घेती पंचक्रोशीतील बांधव

माझा सोडून प्रत्येकाचा चेहरा आहे हसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा
सप्टेंबर 6, 2013

मिच्छामी दुक्कडम

माझे काही जैन मित्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांना भेटून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणतात. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात माझ्या हातून घडलेल्या प्रमादांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजपासून आपल्या नात्यामध्ये फक्त सौहार्दाच्या आठवणी असू द्यात. पद्धत आवडली आणि म्हणून माझ्या सर्व आप्त-मित्र-सहकाऱ्यांना गणेश चतुर्थीचा योग साधून म्हणतो …

आयुष्यात मिळाले मजला मित्र जीवाभावाचे
     संगतीमध्ये ज्यांच्या विरले क्लेशही तणावाचे
चुकून कधी जर झाली असली त्यांच्या मना जखम
     मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम

क्षमा करावी सर्व चुकांची विसरुनिया अहम्
     मिच्छामी दुक्कडम म्हणतो मिच्छामी दुक्कडम

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uH_R9uY_rEU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 2, 2013

जबाबदारी

स्वातंत्र्यदिन साजरा करणं हा आता केवळ एक उपचार राहिला आहे. सिग्नलला गाडी थांबवून झेंडा विकत घेणं म्हणजे स्वातंत्र्यदिन . . . महत्प्रयासाने मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपली काही जबाबदारी आहे हेच आपण विसरत चाललो आहोत.

मंदिराच्या रांगेमध्ये मित्र उभे होते चार
गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या विषय होता भ्रष्टाचार
पुजाऱ्याला पाहून एक हळूच म्हणाला दुसऱ्याला
पैसे देऊन आधी दर्शन मिळेल का ते जरा विचार

लाच देणारे घेणारे दोघे असतात तितकेच ठग
नियम असतात सर्वांकरता त्याचं पालन करून बघ

काम करायला घे आधी तू विचार करत बस मग
देशाची ह्या जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ
जुलै 19, 2013

टोणगा

'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ही म्हण कुणीतरी खास मध्यमवर्गीयांकरता लिहून ठेवलेली असावी. आपण मनाशी काही ठरवून मनोरथांचे इमले बांधावेत आणि व्हावं काहीतरी भलतंच ह्या गोष्टीची प्रयत्न करूनही सवय होत नाही. असेच काही टोणगे ...

रोज पहायची मला
     बसस्टॉपवर ती बाला
आज विचारू उद्या
     म्हणता उशीर झाला

मला मामा म्हणणारा तिला पोरगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला

विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला
जुलै 5, 2013

वेल

निसर्गाची हेळसांड केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात ते उत्तराखंडातील घटनांवरून चांगलंच लक्षात आलं आहे. निसर्गावर कुरघोडी करताना आपणही निसर्गाचं एक अविभाज्य अंग आहोत हेच मुळी आपण विसरून बसलो आहोत.

वाढत गेली वेल परंतु अशी काही वाढली
     बुंध्यासंगे फांद्यांवरही दूर पसरू लागली
झाडावरच्या फुलपानांचा आटोपू लागे खेळ
     ओक्याबोक्या झाडावर मग उरली केवळ वेल
जून 21, 2013

गुन्हा

स्त्री आणि पुरुषांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटावं हा निसर्गनियम आहे. ह्या आकर्षणाशिवाय स्त्री-पुरुषामध्ये प्रेमाची भावना घर करू शकते का? भावनात्मक शुद्ध अकामुक असं प्रेम खरंच असू शकतं का?

विस्फारून मी डोळे पाही चेहऱ्यावर विस्मय
     प्रथमच तिने पाहिले वरती आणून उसना आव
चेहऱ्यावरती थोडी अपेक्षा आणि थोडे भय
     सत्य कळे तिज पाहून माझ्या डोळ्यांमधले भाव
जून 7, 2013

फिरदौस काश्मीर

काश्मीर अजून पाहिलेलं नसताना तुम्ही परदेशवारीचा बेत आखत आहात काय? तसं असेल तर पुन्हा एकदा विचार करा. परदेशात सृष्टीसौंदर्य असेलच ... पण आपल्या काश्मीरातील सृष्टीची श्रीमंती त्यांपेक्षा काकणभर सरसच ठरेल असा माझा दावा आहे.

करण्याला सतत परदेशवारी
     बहु उत्सुक असती नरनारी
काश्मीरास जाऊन पाहावे येथे
     सृष्टीची सुंदरता एकवटली सारी

आधी पाहावे येथले सौंदर्य
     मग खुशाल व्हावे परदेशी मार्गस्थ
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
     हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tu4ozzEjWpM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 17, 2013

टेलीविजन

तुम्हाला एखादं व्यसन आहे का हो? माझी खात्री आहे की तुमच्यासारखी मंडळी बहुतेक व्यसनांना ताब्यात ठेवत असतील. मीही ठेवतो. अपवाद आहे एका व्यसनाचा … टेलीविजनच्या व्यसनाचा! काही वेळा व्यसनमुक्त होण्याकरता काहीतरी धक्कादायक घडावं लागतं. कसं ते वाचा …

माझ्या मनात स्वार्थच आहे गोष्ट सांगते खरी
     टीवी बनूनी जायचे मला असे माझ्याच घरी
बोलत असताना मी घरचे सगळे असतील दक्ष
     दुसरे कुणी बोलले देणार नाहीत तरीही लक्ष
घरात प्रत्येकाला मी मग वाटेन हवी हवी
     देवा पुढल्या जन्मी मजला बनवशील का टीवी
मे 3, 2013

बालपणीची मैत्रीण

फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?

आठवत नाही आता
     आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
     भिन्न जाहल्या वाटा

वाढे जगविस्तार
     असंख्य मनी विचार
नवलाईच्या डोही
     हरवून गेलीस पार