कविता

प्रेमकाव्य

कथा-कादंबऱ्या आणि चित्रपट-नाटकांमध्ये दाखवतात तेवढं अवास्तव नसलं तरी प्रेमाचं आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असतं एवढं नक्की. स्थळ, काळ, वय, ऐपत वगैरे कोणतीही बंधनं न पाळणारी ही भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपुरे पडतात आणि मग काव्याचा आधार घ्यावा लागतो.

फेब्रुवारी 4, 2011

बदलू नकोस

लग्नाआधी एकमेकांना भेटायला जाताना प्रियकर आणि प्रेयसी सिंड्रेला बनून जातात. आणि मग लग्नाचे बारा वाजले की बग्गीचा भोपळा आणि घोड्यांचे उंदीर होतील की काय अशी सतत भीती वाटत राहते. म्हणूनच ह्या प्रियकराचं आपल्या प्रेयसीकडे एकच मागणं आहे ...

भेटतो जेव्हा तुला माझं प्रसन्न होतं मन
     असणं तुझं सुवास आणि हसणं सूर्यकिरण
जग वाटतं निर्मळ आणि जगणं वाटतं सोपं
     अशक्य गोष्टींवरचं तुटतं अशक्यतेचं बंधन

आयुष्य माझं उजळवणं हे थांबवू नकोस तू
     एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू
फेब्रुवारी 4, 2011

एकच मजला सांग …

स्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं ...

निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
     निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
     तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
     नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग